Kumar Saptarshi Passes Away : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. कुमार सप्तर्षी यांचा मुलगा कबीर इंग्लडहून आल्यानंतर सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पुणे : 18-07-2026
ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी (Kumar Saptarshi Passes Away ) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते.
लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. विधिमंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर समाजवादी विचारवंत, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
कुमार सप्तर्षी यांचा मुलगा कबीर सप्तर्षी इंग्लडहून आल्यानंतर सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूडमधील गांधी भवन इथे ठेवले जाणार आहे, त्यानंतर अंत्यसंस्कार होती, अशी माहिती देण्यात आली आहे.
कुमार सप्तर्षी यांचा जीवनपरिचय (Kumar Saptarshi Passes Away )
कुमार सप्तर्षी हे विद्यार्थी दशेपासूनच चळवळीशी जोडले गेले होते. आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात त्यांनी अनेक आंदोलन केली. तर, 9 ऑगस्ट 1977 रोजी चंद्रशेखरजी यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात कुमार सप्तर्षी यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर, जनता पक्षातर्फे 1978 साली ते तेव्हाचे अहमदनगर आणि आत्ताचे अहिल्यानगरमधून आमदार बनले होते.
समाजपरिवर्तनाची चळवळ त्यांनी उभारली होती. युवकांना संघटीत करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली होती. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरूणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली.
डॉ. सप्तर्षी हे केवळ समाजवादी नेते नव्हते. तर ते एक चांगले लेखक, अभ्यासू विचारवंत आणि वक्ते म्हणूनही ओळखले जात होते. समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या र्हासाविरोधात त्यांनी कायम आवाज उठवला. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा प्रभाव त्यांच्या कार्यावर होता.