HSC Board Exams : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे. ही परीक्षा 10 फेब्रुवारी पासून आणि दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
पुणे : 10-02-2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या (HSC Board Exams )परीक्षेला आजपासून (10 फेब्रुवारी) सुरूवात झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 10 हजार 664 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल 15 लाख 32 हजार 847 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली असून, सीसीटीव्ही यंत्रणेसह विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावेत, तसेच परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनीटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांननी कोणताही ताण न घेता निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे, तसेच काही अडचण असल्यास तत्काळ केंद्र प्रमुख किंवा परीक्षा निरीक्षकांशी संपर्क साधावा, अशी माहिती परीक्षा निरीक्षक सीमा सिद्दीकी यांनी दिली आहे.
परीक्षा केंद्रांवर गर्दी आणि लगबग (HSC Board Exams )
आज पासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी प्रशासन एकदम सज्ज आहे. शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. एकीकडे शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार न करता परीक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीत पोलिसांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या परिक्षा सुरक्षित पार पाडल्या जाव्यात यासाठी शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात गर्दी करण्यास पोलीसांकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच नियमाचा भंग केल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिासांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भरारी पथकं तैनात (HSC Board Exams )
ठाणे जिल्ह्यात बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा शिक्षण विभागातर्फे सहा भरारी पथकं तैनात करण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली देखील तालुकानिहाय भराही पथकं नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. यंदा जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेसाठी, अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज हे संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. केंद्रावर रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी देविदास महाजन यांनी महिला विशेष पथक नेमण्यात आल्याचे सांगितले आहे.