Maharashtra Fraud Cases : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक : 22-05-2026
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात (Maharashtra Fraud Cases) तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस)ने या गुन्ह्यांचे संकलन केले असून, राज्य कार्यवाह आण्णा चांदगुडे यांनी याबाबत माहिती दिली.
अनिसने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, राज्यभर भोंदूगिरीविरोधात कारवाया वेगाने सुरू असून, ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा चमत्काराच्या नावाखाली फसवणूक आणि महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जात असल्याची समितीचे म्हणणे आहे.
या कालावधीत नाशिक, संगमनेर, मूर्तीजापूर, पेडगाव, कुर्डुवाडी, वसई, मालाड, पुणे, बारामती, ठाणे, जळगाव, पालघर, धुळे, नवी मुंबई, श्रीरामपूर, पारनेर, दिघी आदी भागांतील विविध भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. अनिसच्या मते, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत भोंदूगिरीची प्रकरणे समोर आली असून, विविध धर्मांतील व्यक्तींवर कारवाई झाल्याने अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केवळ एका धर्मापुरते मर्यादित असल्याचा दावा फोल ठरत आहे.
राज्यभरातील कारवाईत ‘हे’ प्रमुख चेहरे रडारवर (Maharashtra Fraud Cases)
अशोक खरात (नाशिक), राजेंद्र गडगे (संगमनेर), चेतन माळी (मूर्तीजापूर), पंकज घोलप (पेडगाव),मोहन भोसले (कुर्डूवाडी), नाना बढे (आळेफाटा), ऋषिकेश वैद्य (वसई), अल्ताफ रईस खान व रिदम पांचाळ (मालाड), गणेश शिंदे (श्रीरामपूर), अर्जुन चव्हाण उर्फ टन-टन बाबा (नवी मुंबई), अनिल सोलोमन सिंग (पुणे), पिंटू धुमाळ (बारामती), मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित (ठाणे), यशवंत थोरात (पारनेर), शाम महाराज राठोड (दिघी) यांच्यासह 35 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.