Sanjay Raut : सध्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभिर झाली आहे. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मोठ्या मोर्चाचे सुतोवाच केले आहे. काय म्हणाले राऊत जाणून घ्या.
मुंबई : 26/09/2025
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला, खासदार संजय राऊत त्यांच्यासोबत यावेळी होते. शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी भेट दिली.शेतकऱ्यांचे अश्रू पुसत त्यांना धीर दिला. मराठवाड्यातील परिस्थितवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याते सांगत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली. मतदारसंघ पाण्यात बुडालेला असताना तिथे न थांबता, पुण्यात गेलेल्या तानाजी सावंत यांच्यावर (Sanjay Raut) राऊतांनी टीकास्र सोडले.
पीएम केअर फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची मागणी आहे. दिवाळीच्या आधी जनतेला, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर जनतेसाठी जनतेबरोबर रस्त्यावर उतरू असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात भव्य मोरर्चा काढण्यात येईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 11 ऑक्टोबरला शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल. यापूर्वी 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थीतीत ते शिबीर घेणं शक्य नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचे रूपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडाव्यात असे आता ठरले आहे. या मोर्च्याचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे करणार आहे.
सरकार असंवेदनशील- संजय राऊत (Sanjay Raut)
सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासनही त्यापेक्षा असंवेदनशील आहे, प्रशासनावर कोणताही धाक नाही. धाराशिवमध्ये पाऊस, पुरामुळे शेतकरी रडत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावरूनच राऊतांनी असे विधान केले आहे. सरकारने आम्हाला तुटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत की, मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ते आमचा छळ करतील अशी शेतकऱ्यांनी भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.
अनेक निकष लाऊन, आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची ते काळजी घेतील, त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे अधिकारी आहेत, जे नाचतात, बागडतात. लोकं तिथे पाण्यात आहेत. उपाशी आहेत. काही वाहून गेले आहेत. आणि हे इथे नाचत आहेत, अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल राऊतांनी विचारला .