Raj Thackeray : मनसे नेते राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत, आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
मुंबई : 15/10/2025
लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या त्यावरून राज्यात सर्व पक्षांमध्ये चांगलेच राजकारण सुरू आहे. एकीकडे निवडणुकीसाठी पक्षात मोट बांधणी सुरू आहे, तर दुसरीकडे निवडणुक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. विरोधकांनी राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. सर्व मतदार याद्या निवडणूक आयोगाला वेबसाईटवर टाकण्याची मागणी केली जात आहे. या सर्व प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीसह मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने दुसऱ्या दिवशी देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मुलीचे वय 124 तर वडीलांचे वय 43 असल्याची गंभीर बाब मनसे नेते राज ठाकरे यांनी समोर आणली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ? (Raj Thackeray)
मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळाने आयोगावर गंभीर आरोप करत मागण्या केल्या आहेत. याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत माहिती दिली. मनसे नेते राज ठाकरे यांनी माध्यमांच्या समोर मतदार यादीतील घोळ समोर आणला आहे. राज ठाकरे म्हणाले की, ” मतदारसंघ 161 चारकोप, मुलीचे नाव – नंदिनी महेंद्र चव्हाण, मुलीचं वय वर्ष – 124 आणि महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय वर्ष – 43. मतदारसंघ 160 कांदवली पूर्व, मुलीचे नाव- धनश्री कदम, वय वर्ष 23 आणि वडीलांचे नाव दिपक कदम, वय वर्ष 117. कोणी कोणाला काढलं आहे तेच कळत. हा 2024 च्या निवडणुकीच्या आधीचा घोळ आहे,” असे म्हणत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नाव घेत मतदारयादीतील घोळ वाचून दाखवले आहेत.
एवढ्या जागा येऊनही सन्नाटा कसा ?(Raj Thackeray)
पुढे राज ठाकरे म्हणाले की, निवडणुक यादीत घोळ आहे. यादीतील घोळ राज्य आणि निवडणुक आयोगाच्या प्रतिनिधीनसमोर ठेवले. ते सुधारावेत, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले पाहिजे. जे निवडणुक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे. ही रास्त मागणी आहे. यात गोंधळ आणि संभ्रम असण्याचं काम नाही. 2024 विधानसभा निवडणूक झाली. 232 जागा महायुतीच्या आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या जागा आल्यावरही सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष पाहिजे तो झालाच नाही. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा एवढा हा सन्नाटा होता. ही कोणती लोकशाही आहे ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
यावेळी निवडणुक कोणाबरोबर लढवणार ? (Raj Thackeray)
मुंबई महापालिकेच्या निवडणपकीच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव ठाकरे बंधू एकत्रिक येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची युती ठाकरे गटापूर्ती मर्यादीत न रहाता महाविकास आघाडीसोबत ते येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. माध्ममांनी याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न केला. महाविकास आघाडीसोबत युती करणार का ? असा प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले की, ” मी 2017 साली सोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचं आहे. कुणाबरोबर होणार हा आताचा विषय नाही. 2017 लाही मी तेच बोलत होतो. अजित पवारही त्यावेळी सोबत होते. त्यांनी यायला हवं होतं. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते.सांगत होते सर्व गोष्टी.” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.