Pune Vanrai Nature Day : सगळीकडे फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचा वर्षाव होत असताना, पुण्यातील वनराई संस्थेकडून निसर्गाप्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
पुणे : 16-02-2026
एकीकडे संपूर्ण जग ‘व्हॅलेंटाईन डे‘ साजरा करण्यात मग्न असताना, पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी मात्र निसर्गाप्रती आपले प्रेम व्यक्त करत एक अनोखा आदर्श घालून दिला. पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ टिळक स्मारक मंदिर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
लोककला आणि पथनाट्यातून ‘निसर्ग‘ जागर (Pune Vanrai Nature Day)
यंदा या महोत्सवात प्रथमच पथनाट्य आणि लोककला स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. भारूड, पोवाडा, कीर्तन आणि पर्यावरणविषयक गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रदूषण, वृक्षतोड आणि जलसंवर्धन या विषयांवर प्रभावी भाष्य केले.
७० शाळांनी नोंदवला सहभाग नोंदवला. ३० शाळांची चुरशीची स्पर्धा झाली. केवळ मंचावरच नाही, तर गावागावांत जाऊन पर्यावरण जनजागृती करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘नाळ‘ फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे हा होता. त्याच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला वनराईचे विश्वस्त सागर धारिया, रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबतच पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांचाही सन्मान करण्यात आला. त्यामध्ये स्व. डॉ. मोहन धारिया स्मृती पुरस्कार, स्व. अण्णासाहेब बेहरे स्मृती पुरस्कार, स्व. तुळसाबाई सातारकर स्मृती पुरस्कार यांचे वितरण करण्यात आले.
“लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवून त्यांना संवेदनशील व कृतीशील नागरिक बनविणे, हाच वनराईच्या या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.
अमित वाडेकर यांनी नमूद केले की, 2002 पासून ‘वनराई इको क्लब‘च्या माध्यमातून निबंध, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ आणि जलसंवर्धनाचे धडे दिले जात आहेत. सागर धारिया यांनी शिक्षकांना आवाहन केले की, त्यांनी शाळांमध्ये प्रदूषणमुक्त परिसर आणि पर्यावरण सक्षम पिढी घडवण्यासाठी कृतीशील व्हावे.