IMD Rain Forecast : सध्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जनता, शेतकरी हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई : 27/09/2025
महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. राज्यात पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांवर मोठे संकट आणले आहे. यात आता आणखी भर पडली आहे, कारण हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुढील 24 तासात राज्यांतील अनेक विभागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा धोका आणखी वाढला ( IMD Rain Forecast )
भारतीय हवामान विभागाकडून पुढील 48 तास मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड, तसेच विदर्भात बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे.
जालन्यात पावसाचा रेड अलर्ट ( IMD Rain Forecast )
दरम्यान जालन्यात पुढील चार तास हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाड आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, पुढील चार ते पाच तास खुप महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये तर शुक्रवारीच जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.