BCCI Indian Women World Cup : बीसीसीयाने आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी 51 कोटी रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
मुंबई : 03/11/2025
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी , 2 नोव्हेंबर रोजी रात्री आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला हरवून चमकदार ट्रॉफी जिंकली. जेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या विजयामुळे मोठा नफा झाला. आयसीसीने विश्वचषक विजेत्या संघासाठी 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम निश्चित केली होती, जी भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 39.78 कोटी रूपये इतकी आहे.
आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसीपेक्षा जास्त बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी 51 कोटी रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
काय म्हणाले बीसीसीआयचे सचिव (BCCI Indian Women World Cup)
सैकिया म्हणाले की, ” 1983 मध्ये कपिल देव यांनी भारतीय विश्वचषक जिंकून देऊन क्रिकेटमध्ये एका नविन युगाची आणि प्रेरणेची सुरूवात केली होती. आज महिलांनीही तोच उत्साह आणि प्रेरणा दिली आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने आज केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा केला आहे. आमच्या संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा महिला क्रिकेट आधीच पुढच्या पातळीवर पोहोचले होते.
ते पुढे म्हणाले, जय शहा यांनी बीसीसीआयचा कार्यभार स्विकारल्यापासून (2019 ते 2024 पर्यंत बीसीसीआय सचिव म्हणून काम केले), त्यांनी महिला क्रिकेटमध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत. वेतन समतेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी महिलांच्या बक्षीस रकमेत 300 टक्के वाढ केली. बक्षीस रक्कम पूर्वी 2.88 दशलक्ष डॉलर्स होती, आता ती 14 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या सर्व पावलांमुळे महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी – खेळाडू, प्रशिक्षकांसाठी 51 कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आम्ही संघ आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहोत, असे ते म्हणाले. भारताच्या संघाने फायनलमध्ये कमालीची सुरूवात केली आणि फायनलमध्ये भारतीय संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा संघाची फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा हिने पाच विकेटस घेऊन संघासाठी दमदार कामगिरी केली इतिहासात नाव कोरले आहे.