Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे नेते बच्चब कडू यांनी गेले सहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आज सहाव्या दिवशी त्यांनी हे आंदोलन संपूष्टात आणले. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी त्यांना एक आश्वासन पत्र दिले आहे.
महाराष्ट्र : 2025-06-14
बच्चू कडू ( Bachchu Kadu )यांना सरकारकडून आश्वासन पत्र देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. उर्वरित मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी आज आपलं उपोषण सोडलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस सुरू झाला होता. मात्र आज सहा दिवस पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
सरकारचे आश्वासन
- शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.
- समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार.
- थकित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात येईल.
- दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद केली जाईल.
सरकारकडून या आश्वासनांचे पत्र कडू यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. बच्चूकडू यांनी सरकारला कर्जमाफीच्या निर्णयासंबंधी 2 ऑक्टोबर पर्यंत वेळ दिली आहे. बच्चू कडू यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी यावेळी चर्चा केली. सरकारने दिलेले आश्वासन पत्र वाचून दाखवले. सामंत यांनी कडूंना उपोषण सोडण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी फळांचा ज्यूस घेऊन आपले उपोषण सोडले.
काय म्हणाले बच्चू कडू ?
बच्चू कडू यावेळी म्हणाले की, मी आंदोलन स्थगित करत आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी 2 ऑक्टोबर ही डेडलाईन देत आहे. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, सरकारने 2 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर त्यांना मंत्रायलात घुसावे लागेल. जर तुम्ही शेतकऱ्यांकडून बळजबरी कर्जवसूली केली, तर तुम्हाला झाडाला बांधून आम्ही मारू. आंदोलनस्थळी बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एकजूट झाला आहे. हेच आंदोलनाचे यश आहे. 8 दिवसांचा वेळ सरकारला देत आहोत, बळजबरीने वसूली करण थांबले पाहिजे.